तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊमांग नारायणगावकर
आंबेडकर चळवळीतील मातंग
तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊमांग नारायणगावकर
15 जानेवारी 2002, स्मृतिदिन.
भारतीय कला क्षेत्रातील उपेक्षित कलावंत तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे कलाक्षेत्रातील योगदान हे आजही भल्याभल्यांना जमत नाही कारण विठाबाई यांची कलाक्षेत्रातील जी नाळ आहे ती त्यांचे वडील भाऊ मांग यांच्याकडून त्यांना मिळालेला हे फार मोठा वारसा आहे. देशातील जातीयवादी लोकांनी अस्पृश्य समाजातील लोकांना कधीही मानसन्मान व उच्च श्रेणीमध्ये बसू दिले नाही. जरीही त्यांच्याकडे कितीही कौशल्य असले तरीही ते जातीने खालचे असल्यामुळे त्यांच्या कला कौशल्याला कधीही वाव मिळाला नाही. विठाबाई यांचे कलाक्षेत्रातील योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी कला जोपासली त्यांनी कलेला नवा आयाम दिला कला ही केवळ पोट भरण्याची साधन नसून समाज प्रबोधन व समाज जागृतीचे माध्यम आहे! ही समजदारी विठाबाईंकडे होती आणि ही समज त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच भाऊमांग नारायणगावकर यांच्याकडून मिळाली. कारण भाऊ मांग हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील एक महत्त्वपूर्ण शिलेदार होते. विठाबाई एका ठिकाणी म्हणतात ” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर डोंगरा एवढं काम केले आहे. लहानपणी मला त्यांचे दर्शन घडले माझे वडील आणि बाबासाहेब हे एका ताटात जेवले मी त्यावेळी पाच वर्षाची होते माई साहेबांना सांगून त्यांनी मला खाऊ दिला होता त्यांनी आम्हाला जगायची शिकवण दिली.” म्हणून भाऊ मांग आणि विठाबाई यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण भाग काय असेल तर तो म्हणजे हे कलाकार केवळ पोटासाठीच नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांचा कल्याणाचा विचार घेऊन त्या क्षेत्रात काम करणारे होते विठाबाई यांनी रंगमंचावर ज्या पद्धतीने कला सादर केली. आजपर्यंत असे जगात कुठेही उदाहरण सापडत नाही एवढे मोठे काम विठाबाईंनी करून दाखवले आहे कारण त्या आपल्या कलेवर प्रेम करायच्या आणि कलेच्या माध्यमातून रसिकांना कधीही निराश होऊ द्यायच्या नाही. असाच एक प्रसंग विठाबाईंच्या जीवनातील आहे ‘ विठाबाई या नऊ महिन्याच्या गरोदर असताना त्यांचा एक कार्यक्रम आयोजित होता त्या कार्यक्रमात विठाबाई यांनीच रंगमंचावर येऊन नृत्य करावे अशी रसिकांची मागणी होती जर विठाबाई रंगमंचावर गेल्या नसत्या तर कदाचित जमलेल्या समूहाने तो सर्व तमाशा फड जाळून टाकला असता.! म्हणून विठाबाईंनी रंगमंचावर नृत्य करण्याचे ठरवले आणि नृत्य करत असतानाच त्यांना कळा येऊ लागल्या त्या काळा किंवा तो त्रास त्यांच्या पोटात असलेल्या बाळाचा होता म्हणून नृत्य करत असताना विठाबाईंनी नृत्य थांबून रंगमंचाच्या पाठीमागे जाऊन आपल्या पोटातील बाळाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर आपल्या पोटाची नाळ दगडाने ठेचून तोडून टाकली आणि लागलीच विठाबाई रंगमंचावर उपस्थित झाल्या. जगाच्या इतिहासात कदाचित असे उदाहरण कुठेही सापडणार नाही एवढे मोठे योगदान कला क्षेत्रामध्ये विठाबाईंनी दिले आहे.
असे म्हणतात की लता मंगेशकर यांच्या गाण्याने पंडित नेहरूंच्या डोळ्यांमध्ये पाणी आले होते परंतु ज्या युद्धामध्ये युद्ध भूमीवर जाऊन विठाबाईंचे जे योगदान आहे ते योगदान आजही सांगितल्या जात नाही ते योगदान काय होते हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 1962 भारत आणि चीन यांच्यातील युद्ध वेळी नेफा या ठिकाणी जे युद्ध सुरू होते. त्या ठिकाणी युद्धभूमीवर जाऊन आपल्या लहान बाळाला घरी ठेवून सैनिकांसाठी व देशासाठी विठाबाई या रणभूमीवर गेल्या रणभूमीवर जाऊन विठाबाईंनी सैनिकांसाठी प्रेरणादायी गीत गायले नृत्य केले परंतु याबाबतीत सरकारने विठाबाई बद्दल कुठलीच चांगली भूमिका घेतली नाही आणि त्या युद्धामध्ये भारत देशाला जी हार पत्करावी लागली जे सैनिक मारले गेले होते त्यांच्या शोक सभेसाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमांमध्ये लता मंगेशकर यांनी गीत गायले “ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी” हे गाणं लतादीदींनी शोकसभेमध्ये गायलं आणि या गाण्यामुळे भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आले. परंतु युद्धप्रसंगी रणभूमीवर जाऊन देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी विठाबाईंनी जीव धोक्यात टाकला. त्या विठाबाईंकडे दुर्लक्ष करण्यात आले कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांना माहीत होते विठाबाई यांचे वडील हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे खंदे समर्थक व कार्यकर्ते होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक होते म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका आंबेडकरी कुटुंबाला ज्यांचं साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे त्यांना जाणीवपूर्वक डावलून त्यांची उपेक्षा केली. या देशाचे अत्यंत दुर्भाग्य आहे या देशातील कलेला देखील जातीतेच्या चष्म्यातूनच पाहिल्या जाते.
लखन चव्हान
प्रदेश अध्यक्ष,बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य.
संदर्भ:
तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर
लेखक- खुशाल खडसे