उन्हाळी तिळाची पेरणी ही जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. उशिरा पेरणी करणे टाळावे
पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया करावी, किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
उन्हाळी तीळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तीळ हे कमी दिवसांत येणारे पीक असून, सलग, आंतरपीक व मिश्रपीक म्हणूनही घेता येते. हवामान तीळ पीक हे सर्व हंगामात घेता येते. या पिकास २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान पोषक असून, येणाऱ्या पावसाचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जमीन तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. पाणी साचून ठेवणाऱ्या जमिनी या पिकास मानवत नाहीत.
हेक्टरी बियाण्याचे प्रमाण उन्हाळी हंगामातील तिळाच्या पेरणीकरिता ३ ते ४ किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे
.
पेरणी पद्धत तिळाचे बियाणे बारीक असल्याने त्यात समप्रमाणात वाळू किंवा गाळलेले शेणखत किंवा राख किंवा बारीक माती मिसळून पेरणी करावी. सलग लागवडीकरिता पेरणी पाभरीने किंवा तिफनीने ३० सें.मी. अंतरावर करावी. तिळाची बांधावरील लागवड टोकण पद्धतीने करावी. तीळ हे आपत्कालीन पीक म्हणूनही उपयुक्त ठरते. त्याची आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणूनही लागवड करता येते. आंतरपीक पद्धतीमध्ये तीळः मूग (३ः३) हे प्रमाण फायदेशीर आढळले आहे.
विरळणी किंवा खाडे भरणे पेरणीनंतर ७-८ दिवसांनी खाडे भरावेत. पेरणीनंतर १५-२० दिवसांनी पहिली व ८ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपात १०-१५ सें.मी अंतर ठेवावे. म्हणजे शेतात हेक्टरी २.२५ ते २.५० लाख रोपांची संख्या राहील. आंतरमशागत व तण व्यवस्थापन आवश्यकतेनुसार २-३ कोळपण्या किंवा खुरपण्या देऊन घ्यावेत. निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ओलित व्यवस्थापन उन्हाळी पिकास किंवा अर्ध-रब्बी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब ओलित करावे. त्यानंतर जमिनीच्या पोतानुसार १२ ते १५ दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरुवात होताना व बोंड्या भरताना ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. या काळात संरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कापणी तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते. नुकसान होते. त्यामुळे कापणी वेळेवर करावी. झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे.
कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. ३ ते ४ दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साह्याने तीळ झाडावेत. काही बोंड्या तडकल्या नसल्यास ४ ते ५ दिवसांनी परत पेंड्या झाडाव्यात. बियाणे स्वच्छ करून व वाळवून साठवावे.
हेक्टरी उत्पादन ः तिळाच्या पिकापासून हेक्टरी ६ ते १० क्विंटल उत्पादन मिळते.
सुदर्शन बोराडे तंत्रज्ञान समन्वयक पोखरा