देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
जगातील चिमण्यांची घटती संख्या लक्षात घेता जगातील देशांनी चिमण्यांना वाचविण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्याचे जाहीर केले. याकरिता २० मार्च ही तारीख ठरविण्यात आली आणि राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने पहिला जागतिक चिमणी दिवस २० मार्च २०१० ला साजरा करण्यात आला.भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, माणसाच्या जवळपास वावरणारा व नेहमी डोळ्यांनी दिसणारा पक्षी म्हणून चिमणीची भारतभर चांगलीच ओळख आहे. जागतिक चिमणी दिवस साजरा करताना चिमण्यांना व संपूर्ण पशुपक्ष्यांना कशा पद्धतीने वाचविता येईल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. चिमण्यांना राहण्याकरिता घरटे नाहीत याकरिता वृक्षारोपण व्हायला हवे, उन्हाळ्यात चिमण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, त्यामुळे आतापासूनच जिथे-जिथे चिमण्या येऊ शकतात तिथे-तिथे, आपल्या घराच्या भिंतीवर किंवा घरावर एखाद्या तबकड्यात पाणी अवश्य ठेवावे. सोबतच खाण्याकरिता थोडे तांदळाचे दाणे किंवा खाद्य टाकावे, कारण चिमण्यांना खरोखरच आपली नितांत गरज आहे. अन्यथा ज्या चिमण्या दिसतात त्या सुद्धा लुप्त होऊ शकतात, याला नाकारता येत नाही. कारण दिवसेंदिवस चिमण्यांचे प्रमाण कमी-कमी होताना दिसत आहे.चिमण्यांचे आपल्या मानव जातीवर खूप मोठे उपकार आहेत, ते तर आपण फेडू शकत नाही; परंतु आज बदलत्या काळानुसार त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. त्यातून मुक्त करण्यासाठी थोडा हातभार आपण लावू शकतो, याकरिता पाण्याची सोय व खाद्यान्नाची सोय सर्वांनीच आपापल्या परीने केली पाहिजे. चिमण्यांच्या आनुषंगाने अनेक पक्षी पाण्याचा व खाद्यान्नाचा स्वाद अवश्य घेतील आणि आयुष्य वाढेल व चिमण्यांचा किलबिलाट सर्वत्र दिसून येईल. आज जगातील बदलत्या तापमानामुळे व हवामानामुळे, परमाणू परीक्षण, वाढते औद्योगिकीकरण, मोबाइलचे टॉवर, वाढते शहरीकरण, जंगलतोड, शेतातील रासायनिक खतांचा वापर व कीटकनाशके, वणवे लागणे, ध्वनी प्रदूषण, पाणथळ्यांच्या जागा नष्ट झाल्याने आणि जगातील युद्धजन्य परिस्थिती यामुळे चिमण्यांसह अन्य पशु-पक्ष्यांचे जगणे अत्यंत कठीण झाले असून, धोकादायक स्थितीत आहे. यामुळे अनेक पशु-पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आज जंगलतोडीमुळे जंगलातील पशु-पक्षी शहराकडे धाव घेतांना दिसतात. हा संपूर्ण प्रकार निसर्गाचा होत असलेल्या ऱ्हासामुळे दिसून येतो व मानवजातीच्या अतिक्रमणामुळे निर्माण झाला आहे.एकेकाळी चिमणी हा आपला अत्यंत महत्त्वाचा पक्षी होता, कारण लहान मुले जेवणाकरिता कंटाळा करायचे तेव्हा आपली आई किंवा आजी चिमणीची आठवण अवश्य करायची व लहान मुले पोटभर जेवण सुद्धा करायची. “चिव चिव ये, चारा खा, पाणी पी आणि भुर्र उडून जा”, तसेच चिमणीची गोष्ट चिऊताई चिऊताई दार उघड, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे…, असे म्हणत आपला घास भरत, यामुळे आपलं बालपण समृद्ध झाले. कारण आई व आजी इतर पक्षांची ओळख करून देतांना चिऊताईचा लाड जास्तच करायची. चिमण्यांनी आपल्याला बरेच काही दिले, त्यामुळे आज त्यांना आपल्याकडून फक्त पाण्याची अपेक्षा आहे, ती आपण अवश्य पूर्ण करूया.जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून भारतासह जगातील संपूर्ण देशांनी आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा संकल्प करावा व वृक्षारोपण करावे. यामुळे गुरांना चारा, पशु-पक्ष्यांना राहण्यासाठी घरट्यांसाठी जागा उपलब्ध होईल, मानवाला शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल. यामुळे पर्यावरण सुधारण्यास मदत होईल व निसर्ग प्रफुल्लित राहील आणि जिकडे-तिकडे हिरवागार गालिचा पसरलेला दिसून येईल. आपण सर्वांनीच चिमण्या वाचविण्याचा संकल्प करूया.