प्रशिक्षक बि.आर.टाळीकोटे
शेतकऱ्यांना आवाहन..!!
शेतकरी मित्रांनो…या खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढणीच्या वेळी सतत पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाणे भिजण्याची शक्यता आहे.(शेतकऱ्यांकडील बियाणे उत्पादन तसेच कमर्शिअल बियाणे उत्पादन) त्यामुळे त्याचा परिणाम पुढच्या हंगामात बियाणे उगवण क्षमतेवर व उत्पादनावर होईल.तसेच बाजारात चांगल्या बियाण्याची कमतरता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या परिस्थितीचे पूर्वनियोजन म्हणून सोयाबीन काढणी सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे की शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले आणि न भिजलेले सोयाबीन पूर्ण पणे बाजारात मध्ये विक्री न करता बियाणे म्हणून राखून ठेवणे गरजेचे आहे.( किमान स्वतःसाठी बियाण्याकरिता आवश्यक सोयाबीन राखून ठेवावे व त्यानंतरच उर्वरित सोयाबीन बाजारचा अंदाज बघून विक्री करावे कारण सगळीकडेच पावसाचा परिणाम आहे,ज्यांचे न भिजलेले, गुणवत्तापूर्ण सोयाबीन असेल त्यांनी गडबड न करता राखून ठेवणे नक्कीच फायदेशीर ठरेल)
तसेच ज्या शेतकऱ्याकडे सोयाबीन राखून/साठवून ठेवण्याची क्षमता आहे त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारचे न भिजलेले सोयाबीन बियाण्यांसाठी राखून ठेवावे ही विनंती. जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा ते बियाणे म्हणून उपयोगी येईल.
ज्या शेतकऱ्यांनी शेवटची फवारणी बुरशीनाशकाची घेतली आहे,वेगळ्या वाणाची भेसळ काढली आहे,काढणीवेळी किंवा नंतर सोयाबीन भिजले नाही,प्रमाणित बियाणे पेरणी केले असेल किंवा कृषी विभागाकडून मिळालेल्या परमिट वरील/पीक प्रात्यक्षिक मधील बियाणे पेरणी केले आहे अशांनी आवर्जून बियाणे म्हणून सोयाबीन राखून ठेवावे.व अशा खात्रीशीर शेतकऱ्यांकडून इतर शेतकऱ्यांनी बियाणे म्हणून सोयाबीन घेण्यास व योग्य प्रकारे साठवून ठेवण्यास हरकत नाही.सोयाबीन च्या दरापेक्षा नक्कीच बियाण्याचे दर जास्त असतील व पैसे देऊनही खात्रीशीर व गुणवत्तापूर्ण बियाणे मिळणे गरजेचे आहे.सोयाबीन पीक हे स्व-परागसिंचित(self pollinated) असल्याने प्रत्येक वर्षी बियाणे बदल करण्याची आवश्यकता नसते.एकदा पेरणी केलेले प्रमाणित बियाणे पुढे 2-3 वर्ष पेरणीसाठी वापरले तरी चालते.त्यामुळे पुढील खरिप हंगामासाठी बियाणे विकत घेण्याची आवश्यकता पडणार नाही आणि पर्यायाने आपला खर्च सुद्धा कमी होईल.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (pocra) उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय उदगीर