मुंबई येथे आझाद मैदानात आमरण उपोषण.
देवणी / प्रतिनिधी (रणदिवे लक्ष्मण):
दिव्यांगाच्या कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी रायगड,रत्नागिरी, औरंगाबाद,जळगाव,धुळे ,लातूर,तसेच देवणी तालुक्यातील राजीव गांधी मूकबधिर निवासी विद्यालय तळेगाव (भो) आदी शिक्षक व कर्मचारी मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसले आहेत.
गेल्या १५ ते २० वर्षापासून दिव्यांग (मतिमंद, मुकबधिर व कर्णबधिर, अंध व अस्थिव्यांग ) विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास व भौतिक सुविधा पुरवत असुन त्यांचा सांभाळ करत आहेत. गेल्या १५ ते २० वर्षापासून शाळेत शिक्षक व कर्मचारी विनावेतन विद्यार्थ्यांची सेवा करीत आहेत. आज दिव्यांगांची वय देखील वाढली आहेत व त्यांना सांभाळणे जिकरीचे झाले आहे. संस्थाचालक कर्जबाजारी झाले असून अनुदानासाठी आम्ही सर्व कमचारी व संस्थाचालक सातत्याने अनुदानासाठी पाठपुरावा व आंदोलने केले आहेत.महाराष्ट्रातील सर्वसाधारण शाळांना शासनाने अनुदान घोषित केले. तसेच दिव्यांग क्षेत्रातील १२३ शाळांना सुद्धा शासनाने या अगोदर अनुदान जाहीर केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३ ते ४ अशा संख्येने वेळोवेळी जवळपास अंदाजे २० ते २५ शाळांना विशेष बाब म्हणून शासनाने अनुदान दिले. सदर शाळा ह्या आमच्या बरोबरच्या शाळा होत्या तरी देखील आम्हाला यापासून वंचित ठेवुन अन्याय केला गेला. शासनाकडून वारंवार अनुदानासाठी तपासण्या केल्या गेल्या, पण तपासण्या करून देखील अनुदान मिळाले नाही. १२३ व विशेष बाब हया शाळांमध्ये काही शाळा या सन २००९ ते २०१५ अशा कालावधीत मधल्या आहेत.या शाळा देखील याच कालावधीमधील व “अ” श्रेणीतल्या असून सुद्धा या शाळांना अनुदान दिले गेले नाही. हा भेदभाव या शाळांबरोबर का ? तरी अनुदानाविषयीचा प्रलंबीत प्रश्न् लवकरात लवकर सोडवावा. सर्व शाळांचे अनुदानाचे प्रस्ताव वित्त् विभाग तसेच सामाजिक न्याय विभागात धोरण अभावी प्रलंबीत आहेत.ते लवकर मंजूर करून अनुदान जाहीर करून घ्यावेत अन्यथा आंदोलन सोडणार नाही अशी माहिती व इशारा रायगड,रत्नागिरी, औरंगाबाद,जळगाव,धुळे,लातूर व देवणी येथील दिव्यांग शाळेच्या शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी दिला.या मरण उपोषणात अध्यक्ष दिलीप जेठे, उपाध्यक्ष भगवानराव गायकवाड, सचिव किशनराव इंगोले, आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित आहेत.