लातूर जिल्हा परिषदेसह दहा पंचायत समित्यांवर प्रशासक
लातूर : विशेष प्रतिनिधी (एम.बि.टाळीकोटे) :
लातूर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकुर, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, देवणी, औसा व निलंगा या दहा पंचायात समित्यांची मुदत याच महिन्यात संपत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विहीत कालमर्यादेत घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाने लातूर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील दहाही पंचायत समित्यांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांची मुदत दि. १३ मार्च २०२२ रोजी संपत असल्याने या पंचायत समित्यांवर आजच प्रशासक नियुक्त होणार असून जिल्हा परिषदेची मुदत दि. २० मार्च २०२२ रोजी संपणार असल्याने आठ दिवसांनंतर जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकांच्या हाती जाणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१(सन १९६२ चा ५) मधील कलम ९१ ब व ७५ ब या कलमांन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने याद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि जिल्ह्यातील दहाही पंचायत समित्यांच्या संबंधीत गट विकास अधिकारी यांना पंचायत समित्यांच्या सर्व अधिकाराचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकार दिले आहेत. पुढील किमान ४ महिन्यांसाठी लातूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांवर प्रशासक म्हणुन जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समित्यांचा कारभार त्या त्या गट विकास अधिका-यांच्या हाती राहणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेची व लातूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकुर, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, देवणी, औसा व निलंगा या दहा पंचायत समित्यांची निवडणुक सन २०१७ मध्ये झाली होती. जिल्हा परिषदेची मुदत दि. २० मार्च २०२२ रोजी तर दहाही पंचायत समित्यांची मुदत आज दि. १३ मार्च २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे दहा पंचायत समित्यांवर आजपासूनच प्रशासक म्हणून गट विकास अधिकारी काम पाहतील तर दि. १३ मार्चपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे कामकाज पाहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp