शहीद सावित्रीमाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा
– प्रा. हरी नरके
अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन पायी आठ किलोमीटर धावतपळत सावित्रीमाई दवाखान्यात पोचल्या.त्यातच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं.
आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वतःच्या गादीसाठी, संस्थानासाठी लढणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या ‘वीरगाथा’गौरवाने सांगितल्या जातात.तथापि आजारी अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन स्वतःच्या मुलाच्या दवाखान्यापर्यंत पोचवून,त्याचा जीव वाचविणाऱ्या आणि स्वतःशहीद होणाऱ्या या शौर्यांगनेची कहाणी मात्र, पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.
ज्ञानज्योती सावित्रीमाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत राहिल्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १,००० गरीब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणणे. या चार कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीमाईंचं ऐतिहासिक योगदान अधोरेखित होतं.
राजकीय ऋषी नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांनी सयाजीराव गायकवाडांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीमाईंबद्दल म्हटले आहे की,”जोतिरावांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी?आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील.त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले ( ३१ जुलै, १८९० ).”
जोतीराव सावित्रीमाईंची ‘विषयपत्रिका’
शिक्षण, स्त्री-पुरुष समता, सामाजिक न्याय या विषयांची ‘सावित्री-जोती’ यांनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे.त्यांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून येतं.त्यामुळेच त्यांचे जीवनकार्य आणि विचारांबद्दल समाजाच्या सर्व स्तरांत विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलंय.
सावित्रीमाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर सातारा जिल्ह्यातील नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे.सावित्रीमाई या खंडोजी नेवसे ( पाटील ) यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं.११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.
लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीमाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वतःच्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीमाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर ( जोशी ) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीमाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीमाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तावेजावरून स्पष्ट होतं. हीच देशाची खरी ज्ञानज्योती होय.
शेण नाही; ही तर फुलं आहेत..
सावित्रीमाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीमाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता येताना सनातनी गुंड, टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत.अचकट-विचकट बोलत.कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत.
शाळेत जाताना सावित्रीमाईंना सोबत दोन साड्या घेऊन जाव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीमाईंनी आपल्या कामात खंड पडू दिला नाही. हा छळ असाच सुरू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्ती केली.
बळवंत सखाराम कोल्हे यांनी लिहून ठेवलेल्या आठवणींनुसार सावित्रीमाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणार्यांना म्हणत,”मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो!” बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीमाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणार्या आहेत.
ब्राह्मण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह
१८६३ मध्ये जोतीराव व सावित्रीमाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्त ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीमाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अप्पर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.
जोतीराव आणि सावित्रीमाईंनी स्वतःच्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीमाईंच्या मायेची पखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, “सावित्रीमाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंतःकरणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत.” *दुसर्या एका मुलाने आपल्या आठवणींमध्ये सावित्रीमाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव व सावित्रीमाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.*
बरोबर काय न्यायचं आहे? *महादू सहादू वाघोले लिहितो, "सावित्रीमाई फारच उदार होत्या. त्यांचे अंतःकरण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर त्या फार दया करीत. त्या अन्नदान पण फार करीत. त्या कोणासही जेऊ घालीत. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना त्या आपल्या घरातील लुगडी देत. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या त्यांना म्हणत, "इतका खर्च करू नये." त्यावर त्या शांतपणे बारीक हसत आणि "बरोबर काय न्यायचे आहे?" असे तात्यांना विचारीत. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत. जोतीराव तापट तर सावित्रीबाई स्मितभाषी होत्या. जोतीराव आयुष्यात एकदाही सावित्रीमाईंवर रागावल्याचे उदाहरण नाही. सावित्रीमाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ते या बाईंच्या गावीच नव्हते. त्या नेहमीच हसतमुख असत. मात्र, त्यांचं हसू गालांवर तेवढं दिसून येईल, इतकेच ते मर्यादित असे.*
सावित्रीमाईंना सर्व लोक काकू म्हणत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे त्यांना कोण आनंद होई. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने त्या गोडधोड जेवण करीत.*जोतीराव सावित्रीमाईंना मोठा मान देत.त्यांना ते बोलताना 'अहो जाहो' या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत. सावित्रीमाई उत्तर आयुष्यात तात्यांना 'शेटजी' म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीमाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीमाई सुविचारी आणि दूरदृष्टीच्या होत्या. त्यांच्याविषयी आप्तजनांत मोठा आदर होता.*
पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता असे
मुलींच्या शाळांतून त्यांनी शिक्षिकेचे काम केलेलं असल्यामुळे स्त्री शिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत त्यांच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. त्यांच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना त्या नेहमी सदुपदेश करीत. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे त्यांच्या भेटीस येत.
सावित्रीमाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. त्यांच्या अंगावर अलंकार नसत. त्यांच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून दिवसाच्या कार्याला सुरवात करत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटिपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वतः करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत. *जोतीरावांच्या पश्चात सावित्रीमाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या.यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिटरीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशांत जावं लागलं. त्याची पहिली बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला पुरात वाहून गेल्यानं निधन झालं. सावित्रीमाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता. पुढे त्याने दुसरा विवाह केला. त्याला एक मुलगी झाली. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोचे व मुलीचे फार हाल झाले. या मुलीला एका स्थापत्य बिजवराशी लग्न करावे लागले. त्याच्या पत्नीला बेवारस स्थितीत फूटपाथवर मृत्यू आला. तिच्या मदतीला तिची पोटची पोरही आली नाही. या मुलीचे आजचे वारसदार आपण सावित्री-जोतीचे जैविक वारस असल्याचा डांगोरा पिटत असतात. अर्थात त्यांनाही आपण जैविक वारस आहोत, ही माहिती प्रस्तुत लेखकाच्या पुस्तकातून मिळालेली आहे.*
प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड
१८९३ मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीमाईंनी भुषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीमाई खूप राबल्या.
१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकाऱ्यांच्यासारख्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.
सावित्रीमाईंनी डॉ. यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसर-महंमदवाडीला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी डॉ. यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणत आणि त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे, हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या.
मुंढवा गावच्या गावकुसाबाहेरच्या महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन पायी आठ किलोमीटर धावत पळत त्या दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच सावित्रीमाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं.
आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वतःच्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन दवाखान्यापर्यंत पोचवून, त्याला वाचवणाऱ्या आणि स्वतः शहीद होणार्या या शौर्यांगनेची कहाणी मात्र, पाठ्य-पुस्तकांत येत नाही. समाज धुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.
ज्ञानज्योती सावित्रीमाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी सतत राबत राहिल्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरीब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले. अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीमाईंचं ऐतिहासिक योगदान अधोरेखित होतं.
( मॅक्स महाराष्ट्र, ३ जानेवारी, २०२० )