मुखेड / विशेष प्रतिनिधी (एम.बि.टाळीकोटे) : चक्रधरा पासून अनेक संतांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला. बहुजनांमध्ये प्रबोधनाचे काम केले.भेदाभेद सर्व स्तरातील नाहीसे करण्याचे काम केले. रुपकाच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केले. संत आणि तंत त्यांचेही योगदान महत्त्वाचे राहिले आहे. जोपर्यंत आईच्या डोळ्यातील पाण्यात खारटपणा व दुधात गोड चव आहे तोपर्यंत मराठी भाषा चिरंतन राहणार आहे. लोककलांचा अभ्यास आपण केला पाहिजे .इतर देशात प्रत्येक व्यक्ती आपापल्या भाषेतून बोलतात भाषेचा न्यूनगंड बाळगत नाही तसा आपणही बाळगता कामा नये. लोक शिक्षकाची भूमिका लोककलावंत बजावतात. त्या काळातील विद्रोही स्त्री ही जनाबाई आहे. तिचा प्रभाव सावित्रीबाई वर पडला असावा असे वाटते .ज्ञानेश्वरांनी समतेचा मार्ग सांगितला. प्रत्येकाने आपल्या शिक्षकांबद्दल आदर बाळगला पाहिजे. नवरात्रोत्सवात चप्पल सोडून चालण्यापेक्षा दररोज एक वृक्ष लावा. प्राण्यांचा बळी दिल्याने ईश्वर पावत नाही. याचा संतांनी विरोध केला .आंबेडकरी जलस्यातूनही प्रबोधन घडत आहे. तमाशा हा तमोगुणाचा नाश करणारा आहे. वसंतनगर मध्ये देखील डिसले गुरुजी निर्माण झाले पाहिजेत. शाहिरांनी लोककलावंतांनी मराठी अस्मिता जपली असे प्रतिपादन लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ मुंबई येथील विभाग प्रमुख प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड येथील मराठी विभागामार्फत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त आयोजित ‘लोकपरंपरा आणि मराठी भाषा एक अनुबंध’या विषयावर प्रमुख होते म्हणून बोलताना केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की राज्य सरकारवर पुन्हा पुन्हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा असे म्हणण्याची वेळ येणार नाही इतके मराठी भाषेवर आपण प्रेम केले पाहिजे. आजचा कार्यक्रम परिपूर्ण वाटला.वक्त्याने सर्वांगाने प्रबोधन केले. मराठवाड्यात नैसर्गिक साधन संपत्ती जरी नसली तरी मानवी संपत्ती मोठी आहे. आज प्रसार माध्यमातून मराठी भाषा शुद्ध स्वरूपात येत नसून इंग्रजीची सरमिसळ झालेली दिसते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंडित शिंदे यांनी केले. सूत्रसंचलन मराठी विभागात कार्यरत प्रा.डॉ. कविता लोहाळे यांनी केले तर आभार याच विभागातील प्रा.डॉ. ज्ञानेश्वर शिंदे यांनी मानले.
तंत्र सहाय्यक म्हणून संगणक विभाग प्रमुख प्रा. एस.एस. पाटील,प्रा. गोविंद पांडे तथा हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ गुरुनाथ कल्याण यांनी काम केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे,माजी प्राचार्य डॉ.देविदास केंद्रे, माजी प्राचार्य तथा प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.डॉ. रामकृष्ण बदने,आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा बळीराम राठोड,सिनेट सदस्य प्रा.डॉ. संजीव रेड्डी,स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ. व्यंकट चव्हाण, सह स्टाफ सेक्रेटरी प्रा.सौ.शिल्पा शेंडगे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. बाबाराव, प्रा.शंकरय्या कळ्ळीमठ,कार्यालय अधिक्षक रमेश गोकुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व अन्य महाविद्यालयातील काही प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
