देवणी / प्रतिनिधी : शेतकऱ्यांनी रस्त्याच्या प्रश्नांवरून एकमेकातील द्वेष भावना वाढवीत एकमेका विरुद्ध तक्रारी करणे, निर्णयाविरुद्ध महसुली न्यायालयातील अपील व रिव्हिजन चे अर्ज दाखल करणे, दिवाणी न्यायालयात दावे व याचिका दाखल करून एकमेकांचा वेळ व पैसा खर्च करून, तसेच कायमस्वरूपी वैमनस्याची भावना वाढवून भांडण-तंटे करत बसण्यापेक्षा, सामंजस्य व सामोपचाराने रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकजूट दाखविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन निलंगा येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी आज पंचायत समिती सभागृहात केले.
त्या देवणी तालुक्यातील
नकाशावरील शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करणे व मजबुतीकरण करणे बाबत सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, तलाठी व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी हे मत मत व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी गाव नकाशावर असणारे 100% रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, एवढेच नाही तर ज्या रस्त्यावरून आपण पिढ्यानपिढ्या जात आहोत असे वहिवाटीचे रस्ते देखील रुंदीकरण करून कायमस्वरूपी मजबुती करण्यासाठी प्रस्तावित करावेत असे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे गटविकास अधिकारी सोपान अकेले,
नायब तहसीलदार विलास तरंगे, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही एस कांबळे, पोलीस उपनिरीक्षक श्री शेख, भूमी अभिलेख विभागाच्या श्रीमती पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री तडखळकर व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपाभियंता नागेश स्वामी यांच्यासह देवणी तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक व शेतकरी यांची उपस्थिती होती.

