सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची घराघरात पुजा केली पाहिजे; दलितमित्र बालासाहेब शिंदे
जळकोट / प्रतिनिधी :
भारतीय समाजात सत्यवानाच्या सावित्रीची कथा सर्वांना माहित आहे. पुराणातल्या या सवित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाच्या तावडीतून सोडवून आणल्याचे आपण ऐकतो; परंतु या आधुनिक सावित्रीने हजारो वर्षांपासून मनूरूपी यमाच्या पाशात अडकलेल्या लाखोकरोडो भारतीय स्त्रियांना अज्ञान, रूढीपरंपरा, पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामगिरीतून मुक्त केल्याचे आपण पाहिले आहे, अनुभवले आहे. पुराणातल्या कल्पित सावित्रीचे हजारो वर्षांपासून कौतुक केले जाते. या सावित्रीने फक्त आपल्या पतीचेच प्राण वाचवल्याचे आपण ऐकतो; परंतु या आधुनिक सावित्रीने धर्माच्या, अंधरूढींच्या पाशात अडकलेल्या सर्व धर्मातील स्त्रियांना शिक्षण देऊन कायमचे मुक्त केले. या आधुनिक समाजात सन्मान झाला पाहिजे. तिच्या विचाराची रोज घराघरात पूजा केली पाहिजे; परंतु असे होत नाही याची मला खंत वाटते. असे प्रतिपादन दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले.
मंगळवारी (दि.०३) जानेवारी रोजी कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय जळकोट रोड येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या.जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणूनही साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक चे मुख्याद्यापक एन.पी.गित्ते हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक तथा दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, प्राथमिक चे मुख्याधापक व्ही.पी.पाटील आदीसह ईत्तर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, माध्यमिक मुख्याध्यापक, प्राथमिक मुख्याद्यापक, पदधिकारी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकवृंद, वरिष्ट लिपीक, कर्मचारी, सेवक, शिपाई, परिचर, विद्यार्थी-विद्यार्थिनी, माता, पालक यांच्या वतीने पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माध्यमिक चे मुख्याध्यापक एन.पी.गित्ते यांनी बालिका दिन महत्त्व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनीना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय स्वामी यांनी केले.तर आभार प्रदर्शन नागेंद्रे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp