खास बातमी.. विशेष बातमी

२०२१-२२ या हंगामात उसाचे विक्रमी उत्पादन;इथेनॉल विक्रीतून २०,००० कोटींचा महसूल

नवी दिल्ली : वर्ष २०२१-२२ या हंगामात उसाचे उत्पादन, साखरेचे उत्पादन,साखर निर्यात, ऊस खरेदी, उसाची देय रक्कम आणि इथेनॉल उत्पादन या सर्वच क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित झाले.
या वर्षात देशात ५००० लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे उत्पादन झाले.
साखर कारखान्यांनी ३९४ लाख मेट्रिक टन साखर तयार केली आणि त्यापैकी ३६ लाख मेट्रिक टन साखर,
इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात आली.

आता भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक म्हणून उदयास आला आहे.
ब्राझील नंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार झाला आहे.
साखर हंगाम २०२१-२२ मध्ये साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडून कोणतेही आर्थिक अनुदान न घेता १.१८ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ऊस खरेदी केला आणि हंगामासाठी १.१५ लाख कोटी रुपयांहून अधिक देयके जारी केली.

साखर क्षेत्राला स्वयंपूर्ण करण्यासाठीची दीर्घकालीन उपाययोजना म्हणून केंद्र सरकार साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी साखर देण्यासाठी तसेच त्यांनी उत्पादन केलेली अतिरिक्त साखर निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. जेणेकरून या कारखान्याच्या मालकांना ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची देणी वेळेवर देणे शक्‍य होईल.
आता साखर क्षेत्र स्वयंपूर्ण झाले आहे.
२०२१-२२ च्या साखर हंगामापासून या क्षेत्राला कोणत्याही अनुदानाची गरज भासलेली नाही.

वर्ष २०२१-२२ मध्ये साखर कारखाने आणि डिस्टीलरीज यांनी इथेनॉल विक्रीतून २०,००० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे.
११० लाख टन साखरेची म्हणजे आतापर्यंतची सर्वोच्च प्रमाणातील निर्यात या हंगामात झाली. साखरेच्या निर्यातीतून देशाला ४०,००० कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळाले आहे.
वर्ष २०२२-२३ च्या साखर हंगामात निर्यातीसाठी सर्व साखर कारखान्यांना सुमारे ६० लाख टन साखरेचा कोटा मंजूर करण्यात आला असून १८ जानेवारी २०२३ पर्यंत त्यापैकी सुमारे ३० लाख टन साखरेची कारखान्यांमधून उचल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp