२२ प्रतिज्ञांचा अर्थ आम्हाला केंव्हा कळणार?

२२ प्रतिज्ञा म्हणजे मानव जातीच्या जीवन जगण्याची आचारसंहिता होय!
२२ प्रतिज्ञा हा समाजक्रांतीचा कार्यक्रम आहे ! बौध्द धम्माचा सार म्हणजे २२
प्रतिज्ञा! स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे २२ प्रतिज्ञा ! बौध्दांचा कायदा म्हणजे
२२ प्रतिज्ञा ! असे असतांना सुध्दा आम्ही देवादिकांकडे का वळतो दहीहांडीमध्ये
का सहभागी होतो? गणपती उत्सवात का म्हणून नाचतो? दुर्गादेवीच्या दर्शनाला
जाऊन तिथे दांडिया का म्हणून खेळतो?आम्हाला बाबासाहेबांनी बुध्द धम्माची
दीक्षा देऊन आणि २२ प्रतिज्ञा देऊन आज उणेपूरे ६३ वर्षे होत आहेत. तरीही
आम्ही धम्माच्या शिकवणी विरूध्द का वागतो? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी
बेईमानी का करतो? कधी कळणार आम्हाला २२ प्रतिज्ञांचा अर्थ? हे न समजणारे
कोडे न जाणे समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहे.
याचसाठी केला होता काय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपाशी पोटी
१८-१८ तास अभ्यास? याचसाठी जाळला होता काय त्यांनी आपला देह
मेणबत्ती सारखा? याचसाठी दिली काय त्यांनी आपल्या स्वतच्या चार
लेकरांची आहुती? वेळेवर योग्य तो उपचार न मिळाल्याने वयाच्या ३७ व्या
वर्षी रमाईने देह याचसाठी त्यागला काय? मोठमोठ्या नोकऱ्यांना ठोकरून
केवळ समाजासाठी झटणाऱ्या महामानवाने याचसाठी सर्व धर्म आणि पंथाचा
अभ्यास करून आमच्या उन्नतीसाठी, हितासांठी, कल्याणासाठी, भल्यासाठी
आणि रक्षणासाठी बुध्दधम्माची निवड केली होती काय? मती गुंग करणारे हे प्रश्न न जाणे कोणत्या उत्तराच्या शोधात आहेत. बुध्दविहारात येण्यासाठी
बौध्दांना माईकवरून बोलवावे लागते. एक नाही तर दोन-चार वेळा आवाहन
करावे लागते, त्यावेळी कुठे थोडे बहुत लोक विहारात येतात आणि तिकडे
कुणी बोलवित नाही, कुणी विचारीत नाहीत, तरी काही लोक बेशरम सारखे
जातात. तिथल्या मंदिरातील देवाची, देवीची पूजा करतात आणि त्यांच्यापुढे
झुकून आपल्या लाचारीचा, गुलामीचा परिचय देतात. त्यावेळी मात्र ‘ते’ लोक
उघड आणि मनातल्या मनात हसतात आमच्या मानसिकतेवर ! जिथे काहीच
मिळत नाही तिथे हे लोक गर्दी करतात आणि जिथे सर्व काही मिळू मानवाचा
सर्वांगिन विकास होतो तिथे मात्र फिरकत नाहीत.
ज्यांना हजारो वर्षे शिक्षणाचा मुळीच अधिकार नव्हता. त्या स्त्रियांना
शिकविण्यासाठी समाजाचा, वर्ण-व्यवस्थेचा विरोध पत्कारून वेळप्रसंगी मानहानी
सहन करून कर्मटवाद्यांच्या शिव्या- शाप खाऊन खंबीरपणे शिक्षणाच्या
बाजूने उभे राहून तमाम स्त्री वर्गाचा उध्दार करणा-या सावित्रीमाई फुले यांचे
कष्ट वाया जात आहेत का? कारण गणपतीच्या दर्शनाच्या रांगेत ज्या सुशिक्षित
बहुजन समाजाच्या स्त्रिया तासंतास ताटकळत उभ्या राहतात, ते पाहून तरी
तसे वाटणे स्वाभाविक आहे. ज्या देवदर्शनाने, ज्या उपवासाने, ज्या जपाने
आणि ज्या शारीरिक क्लेषाने कवडीचाही लाभ होत नाही, असे शिक्षणातून
ज्या महिलांना ज्या तरुण मुलींना समजले त्याच सुशिक्षित महिलांचा आणि
मुलीबाळीचा त्यात जास्त प्रमाणात समावेश असल्याचे ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत दिसून येते.आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले
होते की, “मी दिलेला बुध्दाचा धम्म टिकवून ठेवण्याचे काम इमाने. इतबारे
जर कोणी केले असेल तर त्या ग्रामीण भागातील अशिक्षित महिला होत आणि
पुढेही त्याच महिला माझा धम्म टिकवून ठेवतील!”ही भविष्यवाणी बोधिसत्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आहे, हे इथे आम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि
ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली, तर त्यांची भविष्यवाणी
किती शतप्रतिशत खरी आहे, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
सावित्रीमाईंचा वारसा पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविला म्हणूनच
त्यांना समस्त स्त्रीवर्गाचे उध्दारक म्हणतात. त्यांच्या कायद्याचे त्यांना कवच
असल्याने त्यांना स्त्रीयांचे संरक्षक म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्री
वर्गाचे मुक्तीदाते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले जाते. या
देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या अभिभाषणात कबूल
केले की, केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच त्या देशाच्या सर्वोच्च
स्थानी विराजमान होऊ शकल्या. आज कोणतेही क्षेत्र असे नाही की,
जिथे महिलांचा शिरकाव नाही. ही सर्व देण फक्त आणि फक्त त्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचीच आहे. असे असतांना जिवंत आणि सत्य विचाराच्या महामानवाला
आपला आदर्श न मानता काल्पनिक देवी देवतांच्या प्रसादावर आणि होत
नसलेल्या कृपेवर जास्त विश्वास टाकून महिलांनी आपल्या जीवनाचे मार्गक्रमण
अधोगतीच्या वाटेने का चालविले आहे? हे न समजण्यापलीकडे आहे.
प्रकांड पंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धवंदनेतील एकच सरणात्तय
गाथा २२ प्रतिज्ञामध्ये फार पद्धशीरपणे बसवून ती गाथा अधिक सोप्या
भाषेत समजावून सांगितली आहे. ती अशी;

नत्थि में सरणं अय्यं, बुध्दो मे सरणं वरं
एतेन सच्च वज्जेनं होतु में जगमंगलमं !!१!!
नत्थि में सरणं अय्यं, धम्मो मे सरणं वरं
एतेन सच्चवज्जेनं, होतु में जयमंगलं !!२!!
नत्थि में सरणं अय्यं, संघो मे सरणं
एतेन सच्चवज्जेनं, होतु में जय जगमंगलम ।। ३।।

या गाथेचा विस्तृत अर्थ असा आहे की, नत्थि म्हणजे नाही. मे म्हणजे माझा, माझे. सरणं म्हणजे शरणस्थान. अय्यं म्हणजे अन्य. बुध्दो म्हणजे बुध्द. वरं म्हणजे श्रेष्ठ, उच्च. एतेन म्हणजे याशिवाय, यापेक्षा
सच्चवज्जेनं म्हणजे सत्यवचन. होन्तु म्हणजे व्हावे. जयमंगल म्हणजे कुशल,
मंगल, उध्दार, कल्याण.
वरील तिन्ही गाथांचा अर्थ जवळपास सारखाच आहे, त्याचे सरळ वाक्य बनविले, तर असे म्हणता येईल की, बुध्द धम्म संघाशिवाय
मला अन्य आधार नाही, आसरा नाही, शरणस्थान नाही.तेच माझे उच्चतम,
श्रेष्ठतम शरणस्थान आहे, श्रध्दास्थान आहे. त्यांच्याशिवाय मी कोणापुढेही नतमस्तक
होणार नाही. जर माझे हे म्हणणे सत्य असेल तरच त्या सत्य – वचनाने माझे जयमंगल होवो. याचा अर्थ इतका सरळ असतांना आणि आम्ही आमचे घरी, विहारात किंवा
धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी म्हणांना उच्च दर्जाचे म्हणतो, श्रेष्ठ दर्जाचे म्हणतो आणि
बाहेर आल्यानंतर इतर देवादिकांना हात जोडून कमी दर्जाचे हीन काम करीत
असू तर आमचे जयमंगल कसे होईल? याचाही विचार झाला पाहिजे ना!
काही लोकांचे म्हणणे असे येते की, आम्हाला त्या लोकांसोबत रहावे लागते
तेव्हा त्यांचे सोबत मंदिरांत जावेच लागते. किंवा ते आमचे वरचे अधिकारी
असल्याने त्यांचे ऐकावेच लागते. हो ठिक आहे ! पण स्वत:ला त्यांच्याप्रमाणे
झुकविणे किंवा मंदिरात गेल्यानंतर त्यांच्यासारखी कृती करणे हे कितपत
योग्य आहे?आणि मग आमच्या स्वाभिमानाचे काय? तो कट्टर बौध्द धम्मीय
आहे, आचरणशिल आहे, शीलवान आहे, नीतीवान आहे, ध्यैर्यवान आहे.
त्याला आपल्यासोबत आपल्या मंदिरात नेणे योग्य नाही किंवा त्याला म्हणणे
सुध्दा बरोबर नाही. तो त्याच्या धर्माचे आचारण करतो. त्याच्या नादाला लागायचे
नाही. आपण आपल्या धर्माप्रमाणे आचरण करावे, अशी भावना इतर- धर्मीयांच्या
मनात पैदा होईल, असे आचरण करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे.
साधा शिपाई असणारा पण कट्टर बौध्दधर्मीयाला त्याचा क्लासवन अधिकारीही
आपल्या घरातील धार्मिक कार्यक्रमासाठी अधिकारवाणीने बोलावू शकत नाही.
असे अनेक उदाहरणे पाहण्यात आली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप परिश्रम करून संघर्ष झेलत बुध्द,
घम्म, संघासारखे आम्हाला सर्वश्रेष्ठ व मौल्यवान रत्न दिलेत, मग आमच्याजवळ
ओरिजनल सोने, असतांना आम्ही पितळाकडे का आकर्षित व्हावे, याचाही
विचार झाला पाहिजे, म्हणून बाबासाहेबांच्या कष्टांना, त्यागाला आम्ही जाणले पाहिजे आणि त्यांनी जसे सांगितले तसेच वागले पाहिजे, जगले पाहिजे. तरच
आमचे कल्याण होईल. भौतिक सुखाला खरे सुख म्हणता येणार नाही.
कारण तो आभास आहे. बुध्द धम्म संघाप्रती नितांत श्रध्दा ठेवून धम्माच्या
अधीन राहून २२ प्रतिज्ञांचे पालन करण्यातच खरी सुख शांती आहे. कोणत्याही
देवीदेवतांजवळ कोणतीही मनोकामणा पूर्ण होत नाही आणि त्यांचा कोपसुध्दा
होत नाही. असे सर्वच्या सर्व शास्त्रांचा अभ्यास करून जगातील सर्वात विद्वान व्यक्तीने आम्हाला सांगितले. अन् ते बोधिसत्व होते. त्या बोधिसत्वाचे ज्यांनी
ज्यांनी ऐकले त्यांचे त्यांचेच कल्याण झाले, मंगल झाले. आणि ज्यांनी ऐकले
नाही ते कुठचेच राहिले नाहीत याला इतिहास साक्षी आहे. शेवटी कसे
वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धम्माचे एक छोटेसे संदेशवाहक म्हणून
सांगणे, हे आमचे कर्तव्य आहे.

भन्ते अश्वजीत
सदधम्म बुद्धविहार, आरती नगर,औरंगाबाद.
मो.नं. ९६७३२९२२९७.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp